अध्याय दुसरा - सांख्ययोग
- Alap Phadke
- 1 day ago
- 7 min read
आपण सर्वांना ठाऊक आहेच कि कुरुक्षेत्रामध्ये आपल्या आप्तेष्टांना पाहून अर्जुनाचे मन विचलित झाले आणि त्याने आपले शस्त्र रणांगणात खाली ठेवले. या वेळीच अर्जुनाला उपदेश करण्यासाठी सांख्ययोगाच्या माध्यमातून भगवंतांनी उपदेश करण्यास सुरुवात केली.
याच सांख्य योगाचे काही म्हत्वाचे टप्पे आहेत त्यातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू...
प्रेरणा -
सर्वप्रथम अर्जुनाची अशी स्थिती पाहून भगवंतांनी अर्जुनाला प्रेरित करणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या जेणे करून अरुणाचा आत्मविश्वास पार्ट यावा आणि युद्धासाठी तो सज्ज व्हावा ! स्वतः भगवंताने अर्जुनाला त्याच्या सामर्थ्याची आठवण करून दिली!
"विचारी तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु ।सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ? ॥"
अर्थात - तू एवढा विचारी असताना असा दीन का होतोस ? अरे अंधाराने कधी सूर्याला गिळलेले पहिले आहेस का ? इवल्याश्या दिव्याने सुद्धा अंधार दूर होतो आणि तू तर सूर्यसमान आहेत !
आपण देखील अनेकदा आपली स्वतःची शक्ती विसरून विनाकारण हतबल होतो. अनेकदा आपण कोणत्या चिंतेत असलो अथवा संकटात असलो तर आपल्याला अचानक आपल्या शक्तींचा विसर पडून जातो ! हीच वेळ असते जेव्हा स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेऊन संघर्ष करत आपण त्या सर्वातून मार्ग काढायला हवा !
अनेकदा असं होत कि आपल्या हातून एखादी चूक होते आणि त्या वेळी आजूबाजूचे लोक आपल्याला त्या चुकीसाठी दोष देत असतानाच संधी साधून आपल्या बाकी देखील सर्व गोष्टी कशा चुकीच्या आहेत आणि आपण कसे असफल आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच मला असं प्रामाणिकपणे वाटत कि अशा प्रसंगात आपण आपली कौशल्य , आपले चांगले गुण , आपली शक्ती यांचा विसर पडू न देता केवळ तेवढी चूक स्वीकारून पुढे जावे अन्यथा आपला आत्मविश्वास कमी होत राहील.
या कलयुगात आपल्याला कोणी निस्वार्थ येऊन उपदेश करणार नाही आपणच आपल्या पुराणातील या साहित्याचा अभ्यास करून आपले आयुष्य जगले पाहिजे.
पुढे भगवंत अर्जुनाला सांगतात कि मूर्खपणाने वागू नकोस आपल्या कोणत्या भावना कोणत्या प्रसंगी लक्षात घ्याव्या हे व्यवहार ज्ञान प्रत्येकात असलेच पाहिजे आणि त्या प्रमाणेच माणसाने वागले पाहिजे.
आपण जेवढ्या स्नेहाने आणि आदराने आपल्या प्रियजनांशी वागतो ते त्यातील एखाद्याने आपले शत्रुत्व पत्करल्यानंतर किंवा स्वार्थी वागल्या नंतर देखील आपण असेच वागत राहिलो तर हे आपल्यासाठीच धोका दायक असते आणि सर्वात महत्वाचे आपल्या ध्येयपूर्तीसाठी असे वागणे हे केवळ मूर्खपणाचे आहे. एखाद्या व्यापारासाठी जर संबंध जोडले तर व्यापारापुरते मर्यादित असावेत त्यात स्नेह भावनेला जागा नाही आणि जर स्नेहानी संबंध जोडले आणि त्यात व्यापार आणला तर दोन्ही संबंध बिघडतात याची प्रचिती तर आपल्या प्रत्येकाला आलीच असेल !
याचाच अर्थ आपण सत्य परिस्थिती ओळखली पाहिजे हाच उपदेश भगवंताने पुढे अर्जुनाला दिला,
सत्य परिस्थिती जेवढ्या लवकर आपण ओळखू तेवढ्या लवकर संघर्ष करणे / त्या परिस्थितीला तोंड देणे शक्य होते.
हे आपल्या आजच्या काळात देखील किती उत्तम लागू होते तुमच्यावर आलेलं संकट मग ते मानसिक असो, शारीरिक असो , आर्थिक असो अथवा सामाजिक असो आपण जेवढ्या लवकर ते स्वीकारतो तेवढ्या लवकर त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधतो.
"हे संकट आलेच का ? असे का झाले ? " याची कारण आपण शोधात बसलो तर आपण त्यातून कधी बाहेर पडू शकणार नाही !
परिस्थिती आणि माणसे यांची सत्यता जेवढ्या लवकर आपल्याला समजेल तेवढे उत्तम!
अशा प्रकारे अनेक गोष्टी समजावून अर्जुनाला पुन्हा युद्धासाठी सज्ज करण्याचा प्रयत्न भगवंताने केला.
अर्जुनाची मनस्थिती -
"अर्जुनविषादयोग" या पहिल्या अध्यायात अर्जुनाला कुरुक्षेत्रात पडलेले आणि असेच काहीसे आपल्याला हि दैनंदिन आयुष्यात पडतात असे काही प्रश्न पाहिले. वरील प्रेरणादायी उपदेशानंतर देखील अर्जुनाच्या मनाची स्थिती फारशी बदलली नव्हती.
आपण देखील विचार करत असाल कि वरील वाचलेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत आणि त्या आधीपासून आपण सर्वांना माहित आहेत परंतु तरीही आपले देखील प्रश्न तसेच आहेत मग अर्जुनाची आणि आपली परिस्थिती सारखीच नाही का ?
तर आपण असं करू कि अर्जुनालाच आपल्या सर्वांचा विशेषतः तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करत भगवंताला प्रश्न विचारात आहे असे समजू आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू !
तर अर्जुनाने भगवंताला विचारले कि या बाहुबलाचा, पराक्रमाचा अर्थात या सामर्थ्याचा काय उपयोग जर या शक्तींचा प्रयोग मला अशा व्यक्तींवर करावा लागणार आहे जे माझेच लोक आहेत ! ज्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत !
या नंतर मात्र श्रीकृष्णाने विचार केला कि आता अर्जुनाला कडवट औषधी देण्याची वेळ आली आहे.
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणीं ।ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥
अर्थात - कडू औषध हे चवीला मधुर नसले तरी आजार बरा करण्याची ताकद त्याच्यात असते, आणि तात्काळ आपल्याला गुण येण्यासाठी देव अशा अनेक गोष्टी घडवून आणतो ज्याने मनात कडवटपणा येतो परंतु आपल्या भविष्यासाठी महत्वाची असते.
ते म्हणतात ना "जे होत ते चांगल्यासाठीच होत! " आणि आजकाल Instagram च्या Trend प्रमाणे यालाच "Trust his plan" असं सुद्धा म्हणतात बरं का !
आत्म्याचे महत्व आणि त्याचा प्रवास -
तर मग भगवंताने अर्जुनाला आत्मा आणि त्याच्या प्रवासाबद्दल सांगण्यास सुरुवात केली. मुळात ज्या भौतिक विश्वात आपल्या प्रियजनांचा मृत्यू अर्जुन ला टाळायचा होता ! युद्ध नको होते या सर्व गोष्टी अर्जुनच्या हातात नव्हत्याच !
मुळातच जन्म मृत्य हाच सर्वात मोठा भ्रम आहे.
जन्म - मृत्य असतो तो शरीराला ! आत्म्याला नाही ! आत्मा चिरंतन आहे.
एक मारणारा आणि बाकीचे मारणारे हा भ्रम आहे ! हे सर्व विधिलिखित आहे आपण त्याला निमित्तमात्र आहोत.
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती ।ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥
अर्थात आपल्या शरीरातील इंद्रिये एखाद्या विषयाचे सेवन करतात आणि आपल्या मनात सुख-दुःखाच्या भावना निर्माण होतात ! आणि ती आपल्या संसर्गाने आपले अंतःकरण ग्रासून टाकतात !
जी माणसे इंद्रियांच्या ताब्यात असतात अशी माणसे या सर्वातून बाहेर पडू शकत नाहीत आपल्याच इंद्रियांनी ग्रहण केलेल्या विषयात स्वतःचे आयुष्य अडकवून ठेवतात !
सोप्या भाषेत म्हणजे आपण स्वतःवर एकदा ताबा मिळविला कि आपण मुक्त होतो परंतु आपला स्वतःच्या मनावर ताबा नसेल तर मात्र आपण लहान सहन गोष्टींमध्ये अडकून राहतो , सुख - दुःखाचे छोटे छोटे क्षण जगत राहतो आणि यातच वेळ मात्र निघून जात असतो !
तेव्हा ना आपल्याला स्वतःला शोधायला वेळ मिळतो ना स्वतःची ध्येयपूर्ती करायला वेळ असतो !
अश्या आयुष्याध्ये उत्तम कार्य कसे करणार ?
आपल्या शरीरातील आत्मा चिरंतन आहे. तो अमर आहे, आपण ज्या पद्धतीने वस्त्र बदलतो त्याच पद्धतीने आपला आत्मा , आपले चैतन्य हे शरीर बदलत असते त्यामुळे वास्तविकपणे पहिले तर हे सर्व विधिलिखित आणि आपण निमित्तमात्र आहोत.
आपण केवळ आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवून स्वधर्माचे पालन करत राहावे असा उपदेश भगवंताने अर्जुन ताथा आपण सर्वांना केला.
स्वधर्म -
आता आपल्या सर्वांनाच प्रश्न पडला असेल कि स्वधर्म म्हणजे काय ? आपला हिंदू धर्म ? नाही !
स्वधर्म म्हणजे कर्तव्य ! आपल्या भावना आणि आपला स्वभाव कधीही आपल्या कर्तव्याच्या आड येऊ न देता त्याचे निर्वहन करत राहणे म्हणजे स्वधर्म !
अर्जुनाचा करूण आणि दयावान स्वभाव हा जणू गायीच्या पवित्र दुधाप्रमाणे आहे परंतु तरीही शरीरात ताप आल्यावर गायीचे दूध प्रश्न केल्यास त्याचे विष होते.
त्याच पद्धतीने युद्धात दया आणि करूणा घातक ठरते !
अर्जुनाने त्याच्या स्वधर्माचा अर्थात क्षत्रिय धर्माचे पालन करावे असा उपदेश भगवंताने केला !
आपण सर्वजण देखील आपल्या स्वधर्माचे पालन करतो का ? आधी मुळात आपला स्वधर्म नक्की कोणता हे आपण सर्वांना उमगले आहे का ? हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा !
आपण जिथे ज्या उद्देशाने काम करतो ते काम म्हणजे आपला स्वधर्म !
या कामात कोणताही मोह , भावना याला जागा नाही !
आपण निश्चित केलेल्या ध्येयासाठी आपल्या कार्यासाठी या स्वधर्माचे पालन करणे अनिवार्य आहे.
याच गोष्टीने आपली कीर्ती वाढेल.
लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें ।परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥
अर्थात - लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात पण अर्जुना कीर्ती वाढवतात.
म्हणूनच आपण आपल्या पैकी ज्यांना अजून स्वधर्म समाजाला नाही त्यांनी तो शोधावा आणि ज्यांना समाजाला आहे त्यांनी त्याचे पालन करत अविरत चांगले कर्म करावे जेणे करून आपले घर, शहर, राज्य, राष्ट्र आणि जगात आपण आपल्या कार्याने ओळखले जाऊ अर्थात आपली कीर्ती वाढेल !
चांगले कर्म -
आता स्वधर्माचे पालन करत चांगले कर्म करत राहावे परंतु कोणत्याही फळाची अपेक्षा करू नये असे भगवंत सांगतात कारण आपण कोणत्या फळाची अपेक्षा करून जर कर्म केले आणि फळ मिळाले तर उत्तम परंतु जर तसे नाही झाले तर मात्र आपण उदास होतो. आपला उत्साह, आत्मविश्वास, धर्म, या सगळ्याच गोष्टी लोप पावत जातात परिणामी आपली अधोगती होत जाते आणि मग ध्येयपूर्ती केवळ स्वप्न बनून रहाते.
म्हनुनच आपण आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून अर्थात १००% मेहनत घेऊन आपले कर्म करत राहिले पाहिजे! आपण जर योगस्थ मनाने अर्थात स्थितप्रज्ञासारखे कार्य करत राहिले पाहिजे !
स्थितप्रज्ञ -
आता आपल्याला प्रश्न पडतो कि स्थितप्रज्ञ म्हणजे नक्की काय ? असा माणूस कसा ओळखायचा ? आपण स्थितप्रज्ञ कसे होऊ ?
तर भगवंताने अनेक लक्षणे अर्जुनाला सांगितली परंतु मी त्यातील काही निवडक आपल्यासमोर मांडतो जी आजच्या काळासाठी सुद्धा संयुक्तिक आहेत.
- आपण नेहमीच समाधानी आणि तृप्त असायला हवे, मोठी स्वप्न आणि नवीन ध्येय ठरविण्यात काहीच वावगं नाही परंतु आणखी प्राप्त करण्याच्या उद्देशाने जर आपण असाधानी राहिलो तर मग आपल्या मनातील या भावनेमुळे आपण कधीच स्थितप्रज्ञाप्रमाणे आपले कार्य पूर्ण करू शकणार नाही परिणामी आपला असंतोष आणखी बळावत जाईल.
- सुखदुःखात स्थिर असणे हे अतिशय आवश्यक आहे. एखाद्या सुखाच्या प्रसंगात अति आनंदित होणे आणि दुःखाच्या प्रसांगात संपूर्ण खचून जाणे चुकीचे आहे. सुख दुःख हे आयुष्यातील चक्र आहे . या दोहोंसाठी आपण तयार असू तरच आपल्या ध्येयासाठी आणि संघर्षासाठी आपण आपले नित्य कर्म योग्य पद्धतीने करू शकू !
- भेदाभेद टाळणे म्हणजे आपण आपले जीवन जगत असताना कोणावर अन्याय करणे अथवा कोणाला खास वागणूक देणे चुकीचे आहे कारण असे केल्यास आपल्या बद्दल लोकांच्या मनात तर भावना निर्माण होतातच परंतु आपल्या देखील मनात संभ्रम बळावतो परिणामी आपण स्थिर विचारांना मुकतो आणि याचा परिणाम आपल्या कार्यावर होतो.
- इंद्रिये आपल्या ताब्यात असणे,
"म्हणौनि आपुलीं आपणपेया । जरी इंद्रियें येती आया ।तरी अधिक कांहीं धनंजया । सार्थक असे ? ॥"
अर्थात - आपल्याला आपली इंद्रिये जर ताब्यात ठेवता येतील तर अर्जुना, दुसरे काही त्याहून मोठे सार्थक आहे काय ? ॥
म्हणजेच म्हणतात ना जो मनुष्य स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवू शकतो तो जग जिंकू शकतो आणि पुन्हा आजकाल instagram च्या भाषेत यालाच आपण Slef Control किंवा Ghost Mode असं म्हणतो !
- मर्यादा ठेवणे
आजकालचे जग हे क्षणिक सुखासाठी हपापलेले आहे आपण या क्षणिक सुखासाठी जर आपली मर्यादा सोडली तर आपण आपले कार्य कधीच योग्य रित्या पूर्ण करू शकणार नाही ! सारासार विचार करू शकणार नाही ! आपल्याला पुन्हा पुन्हा चंचल पणा येईल आपल्याला पुन्हा पुन्हा प्रवाहात वाहण्याची इच्छा निर्माण होईल आणि हि इच्छा सर्वात जास्ती घातक असेल !
उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर पावसात अतिशय मोठ्या प्रमाणात आक्राळ विक्राळ प्रवाह असून प्रलय आणणाऱ्या नद्या देखील शेवटी समुद्राला येऊन मिळतात परंतु समुद्र कधीच तट सोडत नाही ! त्यामुळेच उन्हाळ्यात संपूर्ण नदी कोरडी पडली तरी शांत समुद्र कधीच कोरडा पडत नाही !
या मर्यादेचा बोध घ्या एवढे सुज्ञ आपण सर्व नक्कीच असाल अशी आशा आहे !
अर्जुनाच्या शंका -
अर्जुनविषादयोगात पाहिल्याप्रमाणे अर्जुनाला अनेक प्रश्न होते त्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देखील त्याला आणि त्याच्यासोबत आपल्याला मिळाली असतील परंतु जशा सांख्य योगानंतर अर्जुनाच्या मनातील शंका वाढल्या तशाच आपल्या देखील अनेक शंका वाढल्या असतील !
अर्जुनाने या शंका भगवंतासमोर ठेवल्या या सर्व शंकांचे सार अर्थात मूळ प्रश्न आपल्यासमोर मांडत आहे.
जर संपूर्ण गोष्ट विधिलिखित आहेत तर मग मीच निमित्त का ?
हे युद्ध आणि त्यासोबत एवढा नरसंहार होऊ देणे याला ईश्वर कसा तयार झाला ?
कोणाच्याही मनात चुकीचे विचार निर्माणच्या होत असतील परंतु त्यांचे आत्मे नाही तर केवळ शरीराचा अंत होत असेल तर या युद्धाने काय साध्य होणार ?
आणि या सर्वात जी भूमिका माझ्या कर्माने बजावायची आहे त्याची तरी काय गरज ?
अर्थात पुन्हा एकदा अर्जुन स्तब्ध झाले , भगवंताला शरण गेले...
सांख्ययोग अध्यायाची सांगता झाली
आणि पुढे भगवंताने तिसरा अध्याय "कर्मयोग" या माध्यमातून महान ज्ञानाचे भांडार उघडले !



Comments